Thursday, March 3, 2016

शिक्षक

      प्रजासत्ताक दिन                                                 
       अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग ,येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण सार्वजन येथे जमलेलो आहोत. या प्रसंगी मी तुम्हाला जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हि विनंती.
   १६ व्या शतकात व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी वसाहतवादाचे तत्व अवलंबून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संपूर्ण भारतावर आपले प्रभुत्व स्थापन केले. पैसा कमावणे हा एकमेव उद्देश असल्याने त्यांनी भारतीय लोकांवर अन्याय करण्यास सुरवात केली. या जुलमातून आपली सुटका व्हावी या विचाराने भारतातील जनता एकत्र आली. १८५७चा उठाव या नावाने हा उठाव ओळखू येऊ लागला .१८५७च्या उठावात इंग्रजांचा  विजय झाला परंतु भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती झाली आहे हे इंग्रजांना या उठावामुळे लक्षात आले. या रागाला शांत करण्यासाठी आलन ह्यूम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. सुरवातीला राष्ट्रीय सभेतील सदस्यांनी मावळ भूमिका घेतली परंतु लोकमान्य टिळकांच्या उदयानंतर राष्ट्रीय सभा जहालवादी झाली. ब्रिटीशांच्या कार्यपद्धतीवर लोकमान्य टिळकांनी परखड टीका केली . यामुळे त्यांना तुरुंगात हि जावे लागले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला व राष्ट्रीय सभेशी सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे आली.
   सत्याग्रह या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळेल असा गांधीजींना विश्वास होता. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढा देणे म्हणजे सत्याग्रह . त्याच सुमारास भगतसिंग,चंद्रशेखर आझाद , यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले .
    १९४२ साली गांधीजीनी इंग्रजांविरुद्ध चलेजाव ची घोषणा दिली. पुढे या आंदोलनाने व्यापक स्वरूप प्राप्त केले. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भारत देश एका विशिष्ट घटनेवर चालावा यासाठी घटना तयार करण्याचे ठरले . यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना तयार करण्यासाठी आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात. २६ जानेवारी १९५० रोजी ही घटना अमलात आणण्यास सुरवात झाली व त्या दिवसापासून भारत देश खऱ्याअर्थाने “प्रजासत्ताक गणराज्य “म्हणून ओळखण्यात येऊ लागला.
     भारताला हे वैभव प्राप्त करण्यासाठी असंख्य महात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले .या स्वातंत्र्य वीरांना करूया शतशःप्रणाम
              त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान .
                     जय हिंद !                      

No comments:

Post a Comment